Sunday, June 29, 2025

नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास

नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास 



पुरंदर :  नीरा ता.पुरंदर येथील प्रभाग २ मधिल एका घरात चोरी झाल्याची तक्रार नीरा पोलीसांत देण्यात आली आहे. रोख रक्कम दहा हजार, आईचे व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याची लेखी तक्रार वसीम रफीक बगवान (रा.नीरा वाई नं.२) यांनी दिली आहे. 


    नीरा पोलीस दुरक्षेत्रात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार वसीम रफीक बगवान यांच्या घराचे बांधकाम चालू असलेया मुळे बागवान त्यांचे घरचे आई, वडील भंडारी यांच्या घरी घर भाड्याने घेऊन राहत आहे. २८ जून रोजी रात्री त्यांच्या घरातील पैसे व दागिने चोरीला गेले आहे. रोख रक्कम दहा हजार व आईचे दागिने व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेलेला आहे. बगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार आईचा दोन तोळ्याचा राणीहार, एक तोळ्यांचे दोन तीन प्रकारचे कानातले, लहान बाळाचे मनगटे, बहीणीचे अडिच तोळ्यांचा गंठण व दिड तोळ्यांचा लेक्लेस चोरांनी लंपास केल्याचे तोंडी सांगितले. या चोरीचा पोलीसांनी तपास होण्यासाठी अर्ज केला आहे. 


दरम्यान त्याच रात्री चारच्या सुमारास संशयास्पदरीत्या एक व्यक्ती या परिसरात चालत जाताना दिसत असल्याचे दोन ठिकाणच्या सिसीटव्ही कॅमेरामध्ये दिसतं आहे. हा संशयीत चोर असावा असा अंदाज शेजारील लोक बोलत होते. याच सिसीटव्ही कॅमेराघ्या आधारे पोलीस चोराचा शोध घेत 

आहेत. 

Saturday, June 28, 2025

धक्कादायक विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

धक्कादायक 

विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ;

विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू 



फलटण : 

       राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. विठ्ठल रुक्मिनी सह माऊली माऊलीचा जयघोष करत वारकऱ्यांची पाऊले पंढपुराकडे चालली आहेत. ज्ञानोबा तुकाराम नाम जपत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. याच विठुरायाच्या दर्शनाची ओढ बाळगून असलेला एका वारकरी विसाव्यासाठी थांबले. मात्र, अचानक या वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या वारकऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वडजल ते तांबेमळा दरम्यान निंबाळकर वस्ती येथे नामदेव किसन मारकड वय ८० रा. न्हावी ता. इंदापूर जिल्हा पुणे हे विश्रांती घेत होते व तेथेच झोपी गेले. पालखी पुढे निघाल्यावर नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाहीत. त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना अंत्यसंस्कारासाठी गावी नेले. फलटण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Wednesday, June 25, 2025

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम

 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत


प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम 




पुरंदर दि.२५ : 

     पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावचे सुपुत्र, प्रगतशील अंजीर व सीताफळ शेती व्यावसायिक हनुमंत शिवदास लवांडे पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून मूळचे लातूरचे पण सध्या नारायणपूर येथे राहत असलेले अभिनव शंकर हलसे व अनिकेत शंकर हलसे या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

     उच्चशिक्षण घेण्याची अतोनात इच्छा असलेल्या हलसे बंधूंची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण घेणे जिकीरीचे झाले होते. हा विषय पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, हॉटेल लोणकरवाडा डायरेक्टर, शिक्षक नेते सुनील लोणकर यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या १९९२ ते १९९४ अकरावी बारावी कला विभागाचा मित्र-मैत्रिणींच्या सदाबहार जिव्हाळा मित्र परिवाराला कळविला. त्या सर्वांनी हनुमंत लवांडे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या वतीने त्यांच्या शुभहस्ते सासवड मधील प्रसिद्ध हॉटेल मोहिनी येथे हलसे बंधूंना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

     शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी हनुमंत लवांडे, संतोष लोणकर, संतोष गिरमे, सतीश शिंदे, विजय कुंजीर, अरुण मोहिते, राजेंद्र कुंजीर, धनंजय गाडेकर, बाळासाहेब खेनट, दिलीप कामठे, जीवन दळवी, भाऊसाहेब जगताप, सचिन जगताप, अशोक जगदाळे, रघुनाथ ढवळे, बाळासाहेब कटके, नानासाहेब कुंभारकर, संतोष वारे,  शिवराज लोणकर व सुनील लोणकर उपस्थित होते.

    यावेळी हनुमंत लवांडे म्हणाले, आमच्या जिव्हाळा मित्र परिवाराच्यावतीने हलसे बंधूंना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याविषयी सांगण्यात आले. त्यावेळी मी तात्काळ सासवड मधील प्रियांका जनरल स्टोअर्स मधून शैक्षणिक साहित्य विकत घेऊन माझ्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून त्यांना भेट दिले. यापुढे आमचा जिव्हाळा मित्रपरिवार परिस्थितीने गरीब असणाऱ्या परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी मेहनती असणाऱ्या हलसे बंधूंना वर्षभरासाठी शैक्षणिक मदत करणार आहे.

     यावेळी अभिषेक हलसे व अनिकेत हलसे म्हणाले ,हनुमंत लवांडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला जी शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहे. आम्ही दोघे मन लावून अभ्यास करणार आहोत. आम्हाला आमच्या आयुष्यात पुढे खूप प्रगती करायची आहे.



"दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची" संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीतील जनजागृतीची प्रभावी मोहीम

"दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची"  संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी 


आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीतील जनजागृतीची  प्रभावी मोहीम




सासवड दि.२४ :

        पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची शान असलेली परंपरा आहे. याच पवित्र वारीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे – "दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची" राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य शासनाने या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

चित्ररथ आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ, पथनाट्य पथक, माहितीपूर्ण स्टॉल्स, मोबाईल वॅन आणि जनतेस सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, गर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. “संकटाला घाबरू नका, सज्ज राहा” असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिनांक १९ जून पासून वारी बरोबर प्रारंभ झालेला या संकल्पनेसाठी ४ चित्ररथ असून ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झालेली आहे. दि. ६ जुलै आषाढी एकादशी पर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.




चित्ररथावर विठ्ठल-रखुमाईंची छायाचित्रे, वारकरी परंपरेचे दर्शन, तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे चित्ररूप दर्शन घडते. यामुळे ही संकल्पना अध्यात्मिक श्रद्धेच्या सोबतीने सुरक्षिततेची जाणीव देखील देत आहे.

    वारकऱ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त 

वारीत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन प्रमुख पालख्यांच्या मागोमाग गावागावातील लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत असतात. ही संपूर्ण वारी जिथे भक्तिभाव, कीर्तन, रिंगण, अभंग गजरात रंगलेली असते, तिथेच ही "दिंडी सजगतेची" आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेऊन शांतपणे आपले कार्य करत आहे. वारकऱ्यांनी या चित्ररथांचे आणि माहिती स्टॉल्सचे स्वागत केले असून, “सजग व सुरक्षित वारी” ही संकल्पना सर्वांच्या मनात घर करत आहे.राज्य शासनाचा स्तुत्य उपक्रम हा उपक्रम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि जनतेच्या सहभागाचा उत्कृष्ट संगम आहे. लाखो वारकऱ्यांचे या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रबोधन होत आहे. 



चौकट 


सामाजिक बांधिलकीचा आदर्श :- या उपक्रमातून केवळ आपत्ती व्यवस्थापनाची माहितीच नव्हे तर – "संकट काळात कसे वागावे, आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवावा, कोणती खबरदारी घ्यावी" यासंबंधी देखील प्रबोधन करण्यात येत आहे. वारकऱ्यांनो, सजग राहा – सुरक्षित वारी करा! जय हरी विठ्ठल! जय ज्ञानोबा- तुकोबा!....

  श्री.गिरीश महाजन, मंत्री आपत्ती व्यवस्थापन विभाग महा

राष्ट्र राज्य.

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत 


ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण 


मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन 




मुंबई - अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण 2 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने विविध पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी देखील १० पत्रकारांचा मा. शरद पवार आणि मा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. जवळपास ६५ वर्षे निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना "बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापुर्वी हा पुरस्कार दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश जोशी आदि मान्यवरांना देण्यात आला आहे. 


  अन्य पुरस्कार आणि पुरस्कार्थी पुढील प्रमाणे 


अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठीचा शशिकांत सांडभोर पुरस्कार मुंबई तक चे अभिजित करांडे यांना, स्व. पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार अंमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना, नागोजीराव दुधगावकर पुरस्कार बीड येथील सुराज्य दैनिकाचे संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार दैनिक हेराल्डचे संपादक दिनेश केळुसकर यांना, महिला पत्रकारांसाठी असलेला सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार सिंधुदुर्ग येथील पत्रकार सीमा मराठे यांना, कृषी क्षेत्रातील पत्रकारांसाठी यावर्षी पासून सुरू करण्यात आलेला स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार अँग्रोवनचे पत्रकार बाळासाहेब पाटील यांना, मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दीचे काम उल्लेखनीय करणाऱ्या राज्यातील प्रसिद्धी प्रतिनिधींना दिला जाणारा संतोष पवार स्मृती पुरस्कार यंदा पुणे येथील पत्रकार भरत निगडे यांना देण्यात येणार आहे. 


    दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी, कलाकार भरत जाधव यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. बीधवार दि.२ जुलै २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान मुंबई येथे दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. पुरस्कार वितरण सोहळयास सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी राज्याध्यक्ष शोभा जयपूरकर,  मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई शाखा अध्यक्ष राजा आदाटे यां

नी केली आहे.

Monday, June 23, 2025

डिजिटल मिडिया परिषदेचा लवकरच राज्यव्यापी मेळावा होणार : एस.एम.देशमुख यांची कोल्हापुरात घोषणा

डिजिटल मिडिया परिषदेचा लवकरच राज्यव्यापी मेळावा होणार : एस.एम.देशमुख यांची कोल्हापुरात घोषणा



कोल्हापूर : महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार झाला असून उर्वरित जिल्ह्यात परिषद स्थापन होताच डिजिटल मिडियाचा एक राज्यव्यापी मेळावा पुणे किंवा संभाजीनगर येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी काल येथे केली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक शाखा असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पत्रकारांचा मेळावा, आणि ओळखपत्र वितरण समारंभ काल कोल्हापुरात संपन्न झाला. मेळाव्यास दोन्ही जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सांगली आणि कोल्हापुरात डिजिटल मिडिया परिषदेचे काम जोरात सुरू आहे. एस.एम.देशमुख यांनी या कामाचा आढावा घेतला. तसेच उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

डिजिटल मिडियाला सरकारने जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जीआर मध्ये युट्यूब चँनल्स तसेच पोर्टलचा उल्लेख नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली.



डिजिटल मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना तांत्रिक गोष्टींची माहिती मिळावी यासाठी विभागवार कार्यशाळा घेण्याची परिषदेची योजना असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.यावेळी उपस्थित पत्रकारांनी काही मौलिक सूचना केल्या.

कार्यक्रमास विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, अधिस्विकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, पुणे विभागीय अध्यक्ष हरिष पाटणे, लातूर विभागीय अध्यक्ष विजय जोशी, कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर आदि उपस्थित होते.

जिल्हा अध्यक्ष गणपत शिंदे यांनी प्रास्ताविक केले, अभिजित पटवा यांनी सूत्र संचालन केले, अनिल धुतमाळ यांनी मतं मांडली. यावेळी उपस्थित पत्रकारांना ओळखपत्रांचे वाटप एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील, कार्याध्यक्षपदी राहूल मगदूम यांची नियुक्ती

कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील, कार्याध्यक्षपदी राहूल मगदूम यांची नियुक्ती 



कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पूण्यनगरीचे कोल्हापूर आवृत्ती प्रमुख विजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिनमानचे वरिष्ठ पत्रकार राहूल मगदूम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणीची मुदत संपलेली होती. मात्र नव्या नेमणुका झालेल्या नव्हत्या. अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्तानं दोन दिवस कोल्हापुरात होते. काल कोल्हापुरातील काही मान्यवर पत्रकारांबरोबर चर्चा करून नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

      विजय पाटील आणि राहूल मगदूम यांनी महिनाभरात सर्वांशी चर्चा करून कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्याशी विचार विनिमय करून जिल्हा कार्यकारिणी तयार करावी अशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

       नवीन पदाधिकारी नेमताना ज्या तालुक्यात परिषदेचे काम व्यवस्थित सुरू आहे तेथील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जावे, तसेच कार्यकारिणीत ग्रामीण भागातील पत्रकारांना योग्य प्रतिनिधींत्व द्यावे असेही पाटील आणि मगदूम यांना सांगण्यात आले आहे. 

विजय पाटील आणि राहूल मगदूम यांचे एस.एम.देशमुख यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, अधिस्विकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरिष पाटणे, लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष विजय जोशी, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष दीपक कैतके उपस्थित होते.

चिनी मंडी पोर्टलचे संपादक रणधीर पाटील यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.

Saturday, June 21, 2025

नीरा खोऱ्यात पावसाने घेतली गती ; चार धरणांमध्ये एकूण साठा 35.93 टक्क्यांवर

 नीरा खोऱ्यात पावसाने घेतली गती ; चार धरणांमध्ये एकूण साठा 35.93 टक्क्यांवर



पुणे : नीरा खोऱ्यात मागील चोवीस तासांत समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली असून, त्यामुळे चार प्रमुख धरणांमध्ये एकूण मिळून 1.513 टीएमसी इतका नवपाणी (Inflow) झाला आहे. यामुळे धरणसाठा वाढून 35.93 टक्क्यांवर पोहोचला असून, तो गतवर्षी याच दिवशीच्या तुलनेत चारपट आहे. गतवर्षी या दिवशी केवळ 10.05 टक्के साठा होता.


नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमधील 22 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतचे तपशील पुढीलप्रमाणे 

---

🔹 भाटघर धरण :


पावसाची नोंद : 4 मिमी


एकूण साठा : 231 मिमी


पाणीसाठा : 4.812 टीएमसी


टक्केवारी : 20.47%


 धारणात येणारे पाणी: +599 क्यूसेक्स


---


🔹 नीरा देवघर धरण :


पावसाची नोंद : 20 मिमी


एकूण साठा : 414 मिमी


पाणीसाठा : 2.749 टीएमसी


टक्केवारी : 23.43%


धारणात येणारे पाणी : +228 क्यूसेक्स




---


🔹 वीर धरण :


पावसाची नोंद : 0 मिमी


एकूण साठा : 134 मिमी


पाणीसाठा : 8.209 टीएमसी


टक्केवारी : 87.26%


धारणात येणारे पाणी : +586 क्यूसेक्स


विसर्ग : 2000 क्यूसेक्स


NLBC : 00, NRBC : 300




---


🔹 गुंजवणी धरण :


पावसाची नोंद : 27 मिमी


एकूण साठा : 592 मिमी


पाणीसाठा : 1.594 टीएमसी


टक्केवारी : 43.19%


धारणात येणारे पाणी : +100 क्यूसेक्स




---

 तुलनात्मक पाणीसाठा


चारही धरणांचा मिळून एकूण साठा : 17.365 टीएमसी


साठ्याची एकूण टक्केवारी : 35.93%


मागील वर्षी याच दिवशी साठा होता : 4.859 टीएमसी (10.05%)


 पूर नियंत्रणसाठी नियोजन महत्वाचे


या वर्षी पावसाची सुरुवात समाधानकारक झाली असून, धरणांमध्ये पाणीसाठ्याची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः वीर धरण जवळपास भरल्याच्या स्थितीत असून, त्यामधून विसर्गही करण्यात येत आहे. अशा वेळी प्रशासनाने पाणी नियोजनावर अधिक भर देण्याची गरज आहे.


Friday, June 20, 2025

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग.. कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग

 🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग.. 


कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग 



पुरंदर : 

     पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील सहा तासांत वीर धराणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ८१.८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर  धरणातून शनिवारी सायंकाळी ६ वाजता विसर्ग सुरू करण्यात येणार आहे 


       नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


    वीर धरण ८१.८७ टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये शनिवारी सायंकाळी सह वाजल्यापासून २ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये, कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आव्हान पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


वीर  धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार  वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्यावरील विदुयतगृहाद्वारे 2000 cusecs  विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात येत आहे. 


पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील असे असा इशारा कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी दिला आहे. 

Thursday, June 19, 2025

नीराखोऱ्यात दमदार पावसामुळे ४ धरणांमध्ये १३.६२१ टीएमसी पाणीसाठा

 नीराखोऱ्यात दमदार पावसामुळे ४ धरणांमध्ये १३.६२१ टीएमसी पाणीसाठा


नीरा खोरे अपडेट | २० जून २०२५ | सकाळी ६.००



गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या जलसंपत्ती विभागाच्या अहवालानुसार, भाटघर, निरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चार धरणांमध्ये एकूण १३.६२१ टीएमसी म्हणजेच २८.१८ टक्के साठा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ४.६८४ टीएमसी (९.६९%) पाणीसाठा होता, यामुळे यंदा दुप्पटहून अधिक पाणीसाठा झाल्याचे स्पष्ट होते.


धरणनिहाय सविस्तर माहिती:


भाटघर धरणात आज ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण साठा ३.३८४ टीएमसी (१४.४०%) इतका झाला आहे. सध्या धरणात १२१४ क्यूस्सेकने नवीन पाणी येत आहे.


निरा देवघर धरणात ६८ मिमी पाऊस पडला असून, एकूण साठा १.९७० टीएमसी (१६.७९%) झाला आहे. येथे २४२ क्यूस्सेकचा विसर्ग सुरू आहे.


वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २० मिमी पाऊस झाला असून, साठा ६.९०१ टीएमसी (७३.३५%) पर्यंत पोहोचला आहे. येथून कालव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही.


गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १३६ मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण साठा १.३६४ टीएमसी (३६.९७%) झाला आहे. सध्या येथे २६३ क्यूस्सेकने पाणी येत आहे.




एकूण चारही धरणांचा मिळून ३.२५३ टीएमसीचा नव्याने झालेला विसर्ग नोंदवण्यात आला आहे.


पावसाच्या या हंगामाच्या सुरुवातीलाच नीरा खोऱ्यात समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जर पुढील काही दिवस पाऊस अशीच संततधार धरून ठेवेल, तर खरीप हंगामासाठी पाणीटंचाईची भीती कमी होईल.

वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग लवकरच. कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग

वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग लवकरच. 


कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग 



पुरंदर : 

     पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील सहा तासांत वीर धराणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ६२.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर  धरणातून शुक्रवारी सकाळी  विसर्ग सुरू करण्यात येणार आहे 


       नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


    वीर धरण ६२.६० टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या १२ तासात नीरा नदीमध्ये शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून २ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये, कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आव्हान पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


     

Tuesday, June 17, 2025

विमान दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

विमान दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय? 



मुंबई :

अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं याचं कारण समोर आले. हे कारण आहे थ्रस्ट. अर्थात विमान हवेत उडण्यासाठी ताकदच मिळाली नाही. अहमदाबादच्या एअरपोर्टवरून विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदातच पायलट सुमित सभरवाल यांनी एटीसीला मेडे अर्थात इमरजन्सी कॉल दिला. 650 फूट उंचीवरून सबरवाल यांनी मेडे मेडे मेडे असा तीन वेळा नियमाप्रमाणे कॉल दिला. नो थ्रस्ट, लूजिंग पॉवर अनएबल टू लिफ्ट म्हणजेच विमानाला वर झेपावण्यासाठी शक्ती मिळाली नाही. त्यामुळे विमानाला वर उचलता आलं नाही. त्यावर तात्काळ अहमदाबादचे एटीसीने पायलट सभरवाल यांच्याशी संपर्क साधला. पण सभरवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. 


अन् विमान खाली कोसळलं

टेकऑफपासून 40 सेकंदात विमान कोसळल्याचं दिसत असलं तरी पायलट सभरवाल यांच्याकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला कॉल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून तात्काळ झालेला संपर्क हे सारं काही अवघ्या 15 सेकंदातच झालं असावं. त्यानंतर सभरवाल यांना पुन्हा रिप्लायचा वेळच मिळाला नाही कारण तोपर्यंत विमान कोसळलेलं होतं. 


थ्रस्ट म्हणजे काय?

आता विमानाला थ्रस्ट न मिळाल्यामुळे अपघात झाल्याचं पायलट सबरवाल यांच्या इमरजन्सी कॉलमधून दिसतं. थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती. थ्रस्टद्वारे विमानाला हवेत उडण्यासाठी ताकद मिळते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाईकला जसं अॅक्सेलेटर दिलं जातं त्याच पद्धतीनं विमानासाठी थ्रस्ट काम करतं. म्हणजेच थ्रस्टशिवाय विमान उडू शकत नाही. 


आता थ्रस्टमध्ये प्रॉब्लेम कशामुळे होतो तर पहिलं कारण असू शकतं इंजिना मध्ये बिघाड. टर्बाईन ब्लेड तुटणं किंवा इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास थ्रस्ट कमी होऊ शकतो. इंधन समस्या खराब दर्जाचे इंधन किंवा इंधन सप्लाय पाईपमध्ये बिघाड झाल्यास थ्रस्टवर परिणाम होतो. 


कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड आधुनिक विमान हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर अवलंबून असतात. जर थ्रस्ट कंट्रोल सिस्टीम किंवा सेन्सर्समध्ये बिघाड झाल्यास इंजिन थ्रस्ट देऊ शकत नाही. खराब हवामान जास्त उंचीवर कमी हवेचा दाब किंवा अति तापमान असेल तरी थ्रस्टवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Tuesday, June 10, 2025

पोलीस हवालदार बेपत्ता.... पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ..

 इंदापुरातून पोलीस हवालदार बेपत्ता.... पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ..... आज पहाटेपासून पोलीस हवालदार विष्णू सुभाष केमदारणे बेपत्ता..... इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली तक्रार....केमदारणे यांच्या कुटुंबीयांना घरात एक चिठ्ठी सापडली.... चिठ्ठीत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.....



  बारामती (पुणे)


       पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत...केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.


     मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं या चिठ्ठीत लिहिलेल आहे. 



  पत्नीला पाठवले ऑडिओ रेकॉर्डिंग 


विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे आणि माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे. 


 या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे. खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल असा इशारा ही दिला आहे. सर यासंदर्भात त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.




Sunday, June 8, 2025

भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड : महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार

भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड : महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक


राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार 



दौंड,ता.८ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमलेनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली. 


संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले यांची तर निमंत्रकपदी सुयश देशमुख व सह निमंत्रकपदी मोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष ढमाले हे गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करीत असून, आरोग्य व शिक्षण या मूलभूत घटकात अग्रेसर काम करीत आहे.


चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि.१४ व १५ जून २०२५ रोजी चौफुला ता.दौंड येथे होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दीपक पवार, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे, विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, अरविंद जगताप, रामभाऊ नातू, आनंदा बारवकर, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर, कैलास शेलार, डॉ.अशोकराव जाधव, सौ.रेश्मा जाधव आदी उपस्थित होते. 


भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुका आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, संभाजी बिर्गेडचे प्रवक्ते संतोष शिंदे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक दौंड तालुकाध्यक्ष सागर फडके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश पासलकर, तानाजी केकाण, आनंद थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका अध्यक्ष नितिन दोरगे, केशवराव जेधे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, भाऊसाहेब फडके, नितीन भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


  संमेलनाध्यक्ष म.भा.चव्हाण यांची दूरदर्शन आणि चित्रपट या माध्यमातून त्यांची गीते सर्वदूर लोकांपर्यंत पोहचलेली आहे. संगीतकार राम कदम, गजानन वाटावे, चंद्रशेखर गाडगीळ, अच्युत ठाकूर, रोशन सातारकर, भीमराव पांचाळे आदी संगीतकारांनी त्यांची गीते स्वरबद्ध केलेली आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात कविता आलेल्या आहेत. पुणे विद्यापीठात ते बहिशाल व्याख्याते आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, मृत्युंजय स्मृती पुरस्कार, भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार आणि यु आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रेष्ठता पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. प्रेमशाळा कविता दर्शन या त्यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. पृथ्वीराज प्रकाशन ही संस्था गेली ४० ते वर्ष ते पाहत आहेत, त्यांची 'धर्मशाळा' ,'वाहवा', 'दुनिया' आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

कैवल्य साम्राज्या चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले पाऊल.. माऊलीच्या आश्वांचे कर्नाटक अंकली येथून प्रस्थान.

कैवल्य साम्राज्या चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले पाऊल..

माऊलीच्या आश्वांचे कर्नाटक अंकली येथून प्रस्थान. 



 पुणे : 

     श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील अश्व प्रस्थान वारीसाठी रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी कर्नाटक अंकली येथील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघाले. अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा प्रवास करत मानाचे हिरा व मोती अश्व बुधवार दिनांक १८ जून रोजी माऊली पालखी सोहळा प्रस्थानाच्या एक दिवस आधी आळंदी मध्ये पोहोचणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत असताना आषाढी वारीसाठी मान असणारे कर्नाटक अंकली येथील श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले की, आषाढी पायी वारीचे यावर्षचे हे १९३ वे वर्ष असून तब्बल ११ दिवसाचा प्रवास करून मानाचे अश्व आळंदी माऊली पालखी सोहळा प्रस्थानासाठी परंपरेप्रमाणे सहभागी होऊन माऊली चरणी सेवा रुजू करतील. 


      रविवारी ८ जून रोजी सकाळी १० वाजता माऊलीचे अश्व आळंदीसाठी अंकलीतील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून परिसरातील ग्रामस्थ, भाविक, वारकरी यांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाले. राजवाड्यातील अंबाबाई मातेच्या मंदिरामध्ये विधिवत पूजन, आरती जरीपट्याचे पूजन करून जरीपटका अश्व स्वराचे मानकरी तुकाराम कोळी यांच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच, हिरा व मोती या अश्वांचे व वाहनांचे पूजन केले गेले. आरती झाल्यानंतर मानाचे अश्व दिंडीसह अंकली येथील राजवाड्‌यातून आळंदी कडे मार्गस्थ झाले. पहिल्या दिवशीचा मुक्काम सांगली जिल्ह्यातील मिरज येथे व दुसऱ्या दिवशी सोमवार दि. ९ जून रोजी सांगलवाडी, मंगळवार दि. १० रोजी इस्लामपूर पेटनाका, बुधवार दि. ११ रोजी वहागाव, गुरुवार दि. १२ रोजी भरतगाव, शुक्रवार दि. १३ रोजी भुईंज, शनिवार दि. १४ रोजी सारोळा, रविवार दि. १५ रोजी शिंदेवाडी, सोमवार दि. १६ रोजी व मंगळवार १७ रोजी माऊलीच्या अश्वाचा मुक्काम पुण्यामध्ये व १८ रोजी आळंदी येथे असणार असल्याची माहिती आषाढी वारीसाठी मान असणारे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी सांगितले. 


    अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ कि. मी. चा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असतो. रोज साधारण ३० कि.मी.चा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जातो. मुक्कामाची ठिकाणे परंपरेनुसार ठरलेली असतात. वारी काळात दुपारच्या मुक्कामी माऊलींना आरतीनंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा मान परंपरेनुसार शितोळे सरकारांकडे असून, या नैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अंकलीहून याच दिवशी निघणार आहे. 


- महादजीराजे शितोळे सरकार (कर्नाटक अंकली) 




स्वाराचे कौशल्य

पालखी सोबत असलेल्या दोन अश्वांपैकी एक स्वाराचा आणि दुसरा माऊलींचा असतो. स्वारांच्या अश्वावरील तुकाराम कोळी वयाच्या १५ व्या वर्षांपासून वारीला जात आहेत. सलग २७ वर्षे त्यांना हा मान मिळत आहे. तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य दिसून येते.

Friday, June 6, 2025

धक्कादायक नीरा लोणंद रोडवर तडिपार गुंडांकडून ६ पिस्टल, मोकळ्या मॅग्झीन, ३० जिवंत काडतूसासह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.

 धक्कादायक

नीरा लोणंद रोडवर तडिपार गुंडांकडून ६ पिस्टल, मोकळ्या मॅग्झीन, ३० जिवंत काडतूसासह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त. 



पुरंदर : 


     पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा लोणंद रस्त्यावरील रेल्वे पुलावर सापळा लावून सातारा जिल्ह्यांतून तडिपार असलेले दोन व्यक्ती कार मधून पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळली होती. त्या अनुषंगाने धडक कारवाई करत सिनेस्टाईलने वाहने आडवी लावून ऐन पुलावर पोलीसांनी ती कार थांबवत दोन मोक्क्यातून जामिनावर असलेले व सातारा जिल्हा बंदी असलेले आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे. 


     गुरुवारी (दि. ५) सातारा जिल्हा बंदी असलेले व मोक्क्यातून जामिनावर सुटलेले अमित उर्फ बिऱ्या कदम रा. लोणी व विशाल महादेव चव्हाण रा. भोळी ता. खंडाळा, जिल्हा सातारा हे दोघे मारुती कार क्र. एम.एच. १२- टि.एस.-१८८९ मधून नीरा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीनूसार देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांना त्यांच्या पथकासह वरील ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचेना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने लोणंद नीरा रोडवरील रेल्वे पुलावर सापळा लावून कार क्र. एम.एच. १२- टि.एस.-१८८९ मंदिर तडिपार गुंडंना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ६ देशी बनावटीचे पिस्टल, ६ मोकळ्या मॅग्झीन, ३० जिवंत काडतूसे, दोन मोबाईल व कार असा एकूण १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करुन दोघांवर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अवैध शस्त्र बाळगून तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे माध्यमांना माहिती दिली आहे. 




Tuesday, June 3, 2025

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश

 डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत



डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती 


मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश 



मुंबई : 

      डिजिटल मीडियावरील फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्राम या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल पत्रकारांना शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकताच तसा शासन निर्णय घेतला असून यामुळे डिजिटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना हक्काचा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


    डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे व संपूर्ण डिजिटल मीडिया परिषद सातत्याने पाठपुरावा करत होती. आज अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने ३ जून २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील फेसबुक, युट्युब, 

वेब पोर्टल आणि इन्स्टाग्राम या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल पत्रकारांना हक्काचा रोजगार देण्यासाठी शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत. 


        गेल्या अनेक दिवसापासून मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद यासाठी सातत्याने विविध मंत्र्यांना भेटून डिजिटल मीडियाबद्दलची सखोल माहिती देत होते आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीने शासनाच्या जाहिराती लोकप्रिय होतील याबद्दल सांगत होते. अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी एकमत दाखवत डिजिटल माध्यमांना जाहिराती सुरू करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेकडुन स्वागत करण्यात आले आहे. 


      डिजिटल मिडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळावी यासाठी सुध्दा मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषद सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले.

Featured Post

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान  बारामती :       राष्ट्र...