कैवल्य साम्राज्या चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले पाऊल.. माऊलीच्या आश्वांचे कर्नाटक अंकली येथून प्रस्थान.
कैवल्य साम्राज्या चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले पाऊल..
माऊलीच्या आश्वांचे कर्नाटक अंकली येथून प्रस्थान.
पुणे :
श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील अश्व प्रस्थान वारीसाठी रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी कर्नाटक अंकली येथील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघाले. अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा प्रवास करत मानाचे हिरा व मोती अश्व बुधवार दिनांक १८ जून रोजी माऊली पालखी सोहळा प्रस्थानाच्या एक दिवस आधी आळंदी मध्ये पोहोचणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत असताना आषाढी वारीसाठी मान असणारे कर्नाटक अंकली येथील श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले की, आषाढी पायी वारीचे यावर्षचे हे १९३ वे वर्ष असून तब्बल ११ दिवसाचा प्रवास करून मानाचे अश्व आळंदी माऊली पालखी सोहळा प्रस्थानासाठी परंपरेप्रमाणे सहभागी होऊन माऊली चरणी सेवा रुजू करतील.
रविवारी ८ जून रोजी सकाळी १० वाजता माऊलीचे अश्व आळंदीसाठी अंकलीतील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून परिसरातील ग्रामस्थ, भाविक, वारकरी यांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाले. राजवाड्यातील अंबाबाई मातेच्या मंदिरामध्ये विधिवत पूजन, आरती जरीपट्याचे पूजन करून जरीपटका अश्व स्वराचे मानकरी तुकाराम कोळी यांच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच, हिरा व मोती या अश्वांचे व वाहनांचे पूजन केले गेले. आरती झाल्यानंतर मानाचे अश्व दिंडीसह अंकली येथील राजवाड्यातून आळंदी कडे मार्गस्थ झाले. पहिल्या दिवशीचा मुक्काम सांगली जिल्ह्यातील मिरज येथे व दुसऱ्या दिवशी सोमवार दि. ९ जून रोजी सांगलवाडी, मंगळवार दि. १० रोजी इस्लामपूर पेटनाका, बुधवार दि. ११ रोजी वहागाव, गुरुवार दि. १२ रोजी भरतगाव, शुक्रवार दि. १३ रोजी भुईंज, शनिवार दि. १४ रोजी सारोळा, रविवार दि. १५ रोजी शिंदेवाडी, सोमवार दि. १६ रोजी व मंगळवार १७ रोजी माऊलीच्या अश्वाचा मुक्काम पुण्यामध्ये व १८ रोजी आळंदी येथे असणार असल्याची माहिती आषाढी वारीसाठी मान असणारे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी सांगितले.
अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ कि. मी. चा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असतो. रोज साधारण ३० कि.मी.चा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जातो. मुक्कामाची ठिकाणे परंपरेनुसार ठरलेली असतात. वारी काळात दुपारच्या मुक्कामी माऊलींना आरतीनंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा मान परंपरेनुसार शितोळे सरकारांकडे असून, या नैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अंकलीहून याच दिवशी निघणार आहे.
- महादजीराजे शितोळे सरकार (कर्नाटक अंकली)
स्वाराचे कौशल्य
पालखी सोबत असलेल्या दोन अश्वांपैकी एक स्वाराचा आणि दुसरा माऊलींचा असतो. स्वारांच्या अश्वावरील तुकाराम कोळी वयाच्या १५ व्या वर्षांपासून वारीला जात आहेत. सलग २७ वर्षे त्यांना हा मान मिळत आहे. तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य दिसून येते.
Comments
Post a Comment