Type Here to Get Search Results !

मुंबईत गोवर लसीकरणाच्या जनजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  


गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षामध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे.

राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असेही सांगितले आहे. तसेच, जनमानसात लसीकरणाबाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर लोक प्रबोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबईत 164 बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील 61 रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले. लसीकरणासाठी ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच बालकांना अ जीवनसत्वचा डोस देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाची परिस्थिती चिंताजनक

राज्यातील गेल्या चार वर्षातील गोवरच्या रूग्णांची परिस्थिती पाहता यंदाची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक 3 वेळा झाला. तर 2020 मध्ये ही संख्या 2 वेळा झाला. अगदी मागच्या वर्षापर्यंत म्हणजेच 2021 मध्ये गोवरचा उद्रेक केवळ एकदाच झालेला. मात्र, यावर्षी 2022 मध्ये गोवर उद्रेकाची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये 6421 संशयित रूग्ण आहेत. तर मुंबईत आठ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies