नीरा नदीतल पाणी वाढतंय. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग
नीरा नदीतल पाणी वाढतंय.
नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने उसंती घेतल्याने मागील रविवारपासून (दि.२० जुलै) विर धरणातून विसर्ग बंद केला होता. मात्र गुरुवारपासून (दि.२४) पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काल शनिवारी २.३० वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ५ हजार ३१८ क्युसेक्सने, आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून १४ हजार ४९६ क्युसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला आहे.
आज चारही धरणांच्या भांड्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेले नीरा देवधर धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून ४ हजार १३० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणात ९५.८८ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून भाटघर धरणाच्या अस्वयंचलित द्वारांतून सांडव्याद्वारे ४ हजार क्युसेक्सने तर विद्यूत निर्मिती केंद्रातून १ हजार ६३१ क्युसेक्सने असा नीरा नदिपात्रात ५ हजार ६३१ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरणात ७५.५२ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी सहा वाजल्यापासून २५० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या तीन्ही धराणातून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात येत आहे. वीर धरणात ९५.३२ टक्के पाणीसाठा झाला असून, वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी सहा वाजल्यापासून १४ हजार ४९६ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी असे आव्हान पाटबंधारे विभागाने केले आहे. पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी विसर्गात वाढ अथवा घट केली जाऊ शकते असे ही नीरा पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment