“मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले, आई-भावाची तक्रार खोटी” — भिगवण प्रकरणात तरुणीचे प्रतिज्ञापत्र; कुटुंबीयांचा अपहरणाचा आरोप कायम
“मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले, आई-भावाची तक्रार खोटी” — भिगवण प्रकरणात तरुणीचे प्रतिज्ञापत्र; कुटुंबीयांचा अपहरणाचा आरोप कायम
बारामती
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून २१ वर्षीय तरुणी आणि संबंधित तरुण स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. तरुणीने पोलिसांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण पूर्णपणे स्वेच्छेने जहीर शेखसोबत आल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रतिज्ञापत्रात तिने नमूद केले आहे की, “आमचे गेल्या एक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. माझ्यावर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. आई आणि भावाने दिलेली तक्रार खोटी आहे. मी सज्ञान असून पुढील आयुष्य जहीरसोबतच व्यतीत करणार आहे.”
हजर होण्यापूर्वी काही राजकीय व्यक्तींनी केलेले आरोपही निराधार असल्याचे तिने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी मात्र तिच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. तिच्या भावाने “बहिणीला जबरदस्तीने नेण्यात आले, आम्हाला मारहाण करून डोळ्यात चटणी फेकली,” असा आरोप करत मुलगी आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केली आहे. तर मामाने पोलिस ठाण्यासमोर आत्महत्येचा इशाराही दिला आहे.
एका बाजूला तरुणीचे स्पष्ट प्रतिज्ञापत्र, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांचे गंभीर आरोप — यामुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले जात असून कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा