वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे नीरा येथील दूध व्यावसायिकाला ३००० लिटर दूध द्यावे लागले ओतून
नीरा दि. १९
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील दूध संकलन करणाऱ्या व्यावसायिकाला वीज वितरणाच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. वीज वितरणाचे कोणत्याही प्रकारची सूचना न देता वीज कनेक्शन तोडल्याने त्याच्याकडे असलेले तीन हजार लिटर दूध वाया गेले आहे. हे सर्व दूध आज कोजा गिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अक्षरशः गटारात ओतून द्यावे द्यावे लागले आहे.
यासंदर्भात दूध संकलनाचा व्यवसाय करणारे विराज जगताप म्हणाले की, त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर वीज वितरणने त्यांना लॉकडाऊनचे कारण दाखवत कोणत्याही प्रकारचे बिल दिले नव्हते. मात्र त्यानंतर त्यांना आलेले बिल त्यांनी टप्या टप्याने भरले होते. आता त्यांच्याकडे वीज वितरणाची वीस हजार रुपये बाकी होती.जगताप ते बिल भरण्यासाठी तयार होते. मात्र तरीदेखील वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आज दिनांक १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्लांटची वीज कट केली. आणि यामुळे त्यांचं तीन हजार लिटर दूध वाया गेले आहे. जगताप यांनी वीज वितरणच्या गलथान कारभाराचा निषेध केला . त्याच बरोबर याबाबत ग्राहक न्यायालयाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असे त्यांनी म्हटलंय.