मुंबईपेक्षा पुणे महापालिका मोठी.नगरसेवकांची संख्या मात्र छोटी

 


पुणे  -पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश झाल्यानंतर क्षेत्रफळानुसार पुण्याने मुंबई महापालिकेला मागे टाकले. पुणे ही राज्यातील सर्वाधीक मोठी महापालिका झाली. पुणे शहर क्षेत्रफळाने मुंबईपेक्षा मोठे झाले, त्याचवेळी पालिकेला विस्तारित कारभार झेपणार का?

अशी चर्चा सुरू होती. परंतु, राजकीय सारीपाटावर आखणी करताना राजकीय कारभाऱ्यांनी यामुद्याकडे दुर्लक्ष केले. 2011 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत 11 गावांसाठीचा प्रभाग क्र. 42 तयार होऊन पालिकेत दोन नगरसेवक वाढले. त्यानंतर 2017 मध्ये आणखी 23 गावांचा समावेश झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या त्यापटीत वाढेल, अशी अपेक्षा त्या-त्या गावातील राजकीय नेते मंडळींची होती. परंतु, महापालिका निवडणूक लांबली. शिवाय 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना करण्याचे राज्य शासानाचे आदेश आल्याने आता 23 गावांतून अवघे 4 नगरसेवक वाढणार आहेत. मुंबई पेक्षा पुणे महापालिका क्षेत्रफळानुसार मोठी असताना जनगणना मात्र 2011ची गृहित धरली जात असल्याने पुण्यात नगरसेवकांची संख्या वाढण्याऐवजी कमी असणार आहे. मुंबईत 227 नगरसेवक आणि पुणे महापालिकेत 166 नगरसेवक, ही आकडेवारी पुण्यात निवडणुकीसाठी इच्छुकअसणाऱ्यांसाठी भुवया उंचावणारी ठरत आहे.

पुणे शहरातील संभाव्य प्रभाग रचना :
राज्य सरकारने 173 ऐवजी 166 नगरसेवक संख्या निश्‍चीत केली आहे. तीन सदस्यांचे प्रभाग झाल्यास तीन प्रभाग कमी होतील. यामध्ये 55 प्रभाग तीन सदस्यांचे आणि 1 प्रभाग चार सदस्यांचा असू शकतो. तर चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास 4 सदस्यांचे 41 प्रभाग आणि एक प्रभाग 2 सदस्यांचा होऊ शकतो. किंवा 4 सदस्यांचे 40 प्रभाग आणि दोन प्रभाग तीन सदस्यांचे होऊ शकतात. नगरसेवकांची संख्या मात्र 166 असेल. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदांची संख्या वाढून आपापल्या गावातील प्रथम नगरसेवकहोण्याचा मान मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतु, पदांची संख्या वाढण्याऐवजी ती कमी झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली. त्यात राज्या शासनाने पुन्हा नव्याने प्रभाग रचना जाहीर करण्यास सांगितल्याने ज्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी केली त्यांच्याही अडचणीत वाढ झाली.

गावे समाविष्टची प्रक्रिया
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 1997 मध्ये 38 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2001 मध्ये 15 पूर्ण आणि पाच अंशत: गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आली, त्यामुळे महापालिका हद्दवाढ 23 गावांपुरती मर्यादित राहिली. तर, त्यातही पाच गावे अंशत: होती. पुन्हा 2012 मध्ये येवलेवाडी गावाचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला तर नव्याने 28 गावे समाविष्टची चर्चा सुरू झाली. अखेर, 2014 मध्ये उर्वरीत आणि नवी अशी एकूण 34 गावे महापालिकेत समाविष्टचा निर्णय जाहीर झाला. तर, 2017 मध्ये फुरसुंगी आणि देवाची उरळी ही गावे पूर्ण आणि अशंत: असलेली नऊ गावे अशा 11 गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली.

मुंबईतील नगरसेवक :
मुंबई महापालिकेसाठी 236 वॉर्ड जाहीर झाल्यानंतर पालिकेने पहिली सोडत 30 मे मध्ये (ओबीसी आरक्षण वगळून) काढली होती. परंतु, राज्यात सत्तांतर झाल्याने नव्या सरकारने वाढलेल्या 9 वॉर्डचा निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणे 227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 236 ऐवजी आता किमान 227 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून जाणार आहेत.

पुण्यातील नगरसेवक :
राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने दिलेल्या पत्रांच्या संदर्भानुसार पुणे शहरात 166 नगरसेवक असणार आहेत. महापालिकेमध्ये नगरसेवकांची वाढविलेली 173 संख्या कमी झाल्याने 166 नगरसेवकच आता असणार आहेत.

मुंबईची स्थिती अशी
शहराचे क्षेत्रफळ :
450
चौरस किलोमीटर
पालिकेचे प्रभाग:
226 (
वाढलेले 9 कमी झाले अन्यथा 236)

पुण्याची स्थिती अशी
पुणे शहराचे क्षेत्रफळ :
517.77
चौरस किलोमीटर
पुणे पालिकेचे प्रभाग :
166 (
एकूण 23 गावांचा नव्याने समावेश)

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?